पालकांशी संवाद

जो स्वतःच्या मुलाला त्याच्यातील दोष घालवून त्याच्यात सद्गुण आणण्यासाठी साहाय्य करतो, तोच खरा पालक. सध्याची पालकाची व्याख्या काय ? जास्तीतजास्त महागडे कपडे घेणे, त्यांना हवे ते खायला देणे आणि महागड्या शिकवणीवर्गाला पाठवले की, यांचे कर्तव्य संपले. याने आपण आपल्या मुलाला भोगी बनवत आहोत. भोगाच्या आधाराने अनेक विकार जन्म घेतात. भोगी व्यक्ती अनेक दोषांना जन्म देते. तर त्यागी व्यक्ती सद्गुणांना जन्म देते. तेव्हा पालकांनी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा की, मी मुलाला खरोखरीचे शिक्षण देत आहे का ? ‘एखाद्या जिवाला सद्गुणी करून त्याचे जीवन आनंदी करणे’, हाच पालकाचा धर्म आहे.
 आनंदी पालकच आनंदी पिढी घडवू शकतो. पाल्यावर संस्कार करण्यासाठी पालक आणि पाल्य यांच्यात सुसंवाद असायला हवा. स्वतः तणावमुक्त असलेले पालकच आपल्या मुलांना तणावमुक्त जीवन जगायला शिकवू शकतात. आपल्या पाल्याशी सुसंवाद साधू शकतात. मुलांना तणावात असणार्याा पालकांशी संवाद करावासा वाटत नाही. त्यांना सुचणार्याक नवीन कल्पना, विचार आणि स्वतःच्या समस्या तणावग्रस्त असणार्यात पालकाला सांगाव्याशा वाटत नाही; म्हणून प्रथम पालक स्वतः तणावमुक्त असायला हवा.
पालकांच्या मनावर ताण येण्यामागील कारणे

        सतत भूतकाळात वावरणारे पालक मुलांशी संवाद साधू शकत नाहीत. मुले सतत वर्तमानकाळात जगतात; म्हणून ती सतत आनंदी असतात. आपण आपल्या जीवनात घडलेले अनेक प्रसंग आणि घटना सतत आठवत रहातो. ‘शेजार्याीशी घडलेला प्रसंग’, ‘सासूबाई वाईट बोलल्या’, ‘कार्यालयात अधिकारी बोलले’, या विचारांचे ओझे बहुतेकजण वहात असतात. सहाजिकच मुले काही सांगत असतील, तर आपण त्यांचे विचार ऐकण्याच्या स्थितीत नसतो. तेव्हा आपण सतत वर्तमानकाळात  रहायला शिकले पाहिजे. आपण भूतकाळाच्या विचारात वावरत असल्याने मुले आणि आपण यांच्यात सुसंवाद होऊ शकत नाही.
  ‘तुला काही येत नाही, तुझा काही उपयोग नाही’, अशा नकारात्मक बोलण्याने मुलांच्या मनावर घाव होतात. एक वेळ स्थूलदेहावर केलेले घाव भरून निघतात; पण जिवाच्या मनावर झालेले घाव आपण भरून काढू शकत नाही. तेव्हा मुलांशी बोलतांना सतत सकारात्मक बोलायला हवे. आपल्या बोलण्यातून मुलांना प्रोत्साहन मिळायला हवे.
   स्वतःच्या चुका मान्य केल्याने मनावरचा ताण अल्प होतो. मुलांच्या मनात आपल्याविषयी आदराचे स्थान निर्माण होते. आपले पाहून मुलेही प्रामाणिकपणे चुका मान्य करायला शिकतात. आपण चूक लपवली, तर प्रथम आपल्या मनावर ताण येतो. मुलांना आपल्या सर्व चुका कळतात. ‘बाबा आणि आई स्वतःच्या चुका मान्य करत नाहीत, मग मी का कराव्यात’, असे त्यांना वाटू लागते. त्यामुळे पालक आणि मुले यांच्यात सूक्ष्म-दरी निर्माण होते.
       मुलांमधील दोष सतत पाहिल्याने आपल्या मनावर ताण येतो. आपण मुलांचे गुण पहावेत आणि त्यांचे कौतुक करावे. पर्यायाने मुले स्वतःचे दोष स्वीकारून ते घालवण्यासाठी प्रयत्न करतात; पण बरेच पालक मुलांना सतत दोषच दाखवतात. ‘मुलांचे सतत दोषच पहाणे - तणाव आणि मुलांचे सतत गुण पहाणे - आनंद’, हे सूत्र आचरणात आणले, तर ताण न्यून होण्यास साहाय्य होते.
    पालकांनो, व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. आपल्या मुलाची प्रकृती कोणती आहे, त्याची आवड, कुवत, शारीरिक आणि मानसिक क्षमता या सर्वांचा विचार पालकांनी करायला हवा. स्पर्धावृत्ती आणि समाजातील स्वतःची प्रतिमा यांनुसार काही पालक मुलांशी व्यवहार करतात. पर्यायाने मुले आणि पालक यांच्यात तणाव निर्माण होतो. असे होऊ नये, याकरिता ‘मुलाची प्रकृती समजून संवाद - आनंद आणि मुलाची प्रकृती समजून न घेता संवाद - तणाव’, हे सूत्र लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
  सध्या मुलांच्या समस्या ऐकून घेणारे कोणीच नसते. पालक म्हणतात, ‘आम्हाला कामे आहेत’, तर शिक्षक म्हणतात, ‘आम्हाला आमचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे.’ पर्यायाने आज मुलांची फार मोठी मानसिक कोंडी झाली आहे. त्यामुळे पालकांविषयी मुलांच्या मनात आदर आणि विश्वास राहिला नाही. मग मुले ऐकत नाहीत; म्हणून पालकांच्या मनावर ताण येतो. अनौपचारिक बोलल्यामुळे मने जुळतात. याकरिता मुलांशी प्रतिदिन १५ मिनिटे अनौपचारिक बोलणे आवश्यक आहे. यातून मुले मोकळी होतात. ‘प्रतिदिन मुलांशी १५ मिनिटांचे अनौपचारिक बोलणे - आनंद आणि प्रतिदिन अनौपचारिक बैठक नसणे - तणाव’, हे सूत्र लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागल्यास पालक मुलांशी चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतात.